नागपूर : शहरातील उद्याने ही छोट्या-मोठ्यांसह सर्वांसाठीच आकर्षणाची ठिकाणे असतात. तीस लाखांहून जास्त लोकसंख्या असलेल्या नागपूर शहरात तर शेकडो उद्याने आहेत. 'लॉकडाउन' सुरू झाले आणि ही उद्याने बंद करण्यात आली. तब्बल ऐंशी दिवसांनंतर सोमवारी ही उद्याने नागपूरकरांसाठी खुली झाली. त्यामुळे या उद्यानांत कधी जातो आणि कधी नव्हे असे झाले आहे. परंतु, नागपूर शहरातील अशी अनेक उद्याने आहेत, जिथे ज्येष्ठ नागरिकच काय तर सर्वांनाच जाणे धोकादायक ठरू शकते.
तब्बल अडीच महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर सोमवारपासून शहरातील उद्याने सुरू झाली. मात्र, कोरोनाच्या अनाहूत भीतीमुळे नागरिक फिरायला जात नसल्याचे चित्र शहरात जागोजागी पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून हिरवी झेंडी मिळूनही बहुतांश उद्यानांमध्ये वर्दळ कमी दिसून आली. काही ठिकाणी 'मास्क' घातलेल्यांनाच आतमध्ये परवानगी देण्यात आली. परंतु, अनेक ठिकाणी हा नियम पाळला जातो की नाही, यावर नियंत्रण दिसत नाही.
22 मार्चला लॉकडाउन घोषित झाल्यापासून शहरातील उद्यानांना कुलूप लागले होते. त्यामुळे भर उन्हाळ्यातही सर्वत्र शुकशुकाट जाणवला. परिणामत: सकाळ-संध्याकाळ शतपावली करणाऱ्यांची मोठीच पंचाईत झाली. त्याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर झाला. विशेषत: शहरातील बच्चेकंपनी व ज्येष्ठ नागरिकांना याचा सर्वाधिक फटका बसला. त्यामुळे उद्याने सुरू करण्याविषयी नागपूरकरांकडून वारंवार मागणी होत होती. प्रशासनाने काही अटींवर आजपासून उद्याने सुरू करण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयानुसार, उद्यानांमध्ये फिरताना नागरिकांनी मास्क घालणे तसेच 'सोशल डिस्टन्स'चे पालन करणे आवश्यक आहे. त्याचा सकारात्मक परिणाम पहिल्या दिवशी दिसूनही आला. बहुतांश उद्यानांमध्ये नागरिकांना मास्क घातल्यानंतरच आतमध्ये प्रवेश देण्यात आला. तशी सूचना काही उद्यानांमध्ये दर्शनी भागावर लावण्यात आली होती. धंतोलीसह अनेक उद्यानांमध्ये मास्क न घातलेल्या नागरिकांना परत पाठविण्यात आले. शिवाय उद्यानांमध्ये फिरताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन होईल, याचीही खबरदारी घेण्यात येत आहे.
सुरक्षारक्षक नसलेल्या उद्यानांत नियमांना खो
धंतोलीसारख्या बहुतेक उद्यानांत मास्क घालणे, 'सोशल डिस्टंसिंग' पाळणे आदी खबरदारी घेतली जाते. इथे सुरक्षारक्षकही आहेत. परंतु नागपूर शहरातील अनेक मैदानांवर तसे कुणाचेही नियंत्रण नाही. शहरातील ज्या छोट्या उद्यानांमध्ये सुरक्षा रक्षक नाहीत, तिथे मात्र नियमांचा फज्जा उडवत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा उद्यानांत जाणे नागरिकांसाठी नक्कीच धोकादायक ठरू शकते. त्यामुळे या उद्यानांत जाताना सर्वच नागरिकांनी स्वतःच स्वतःवर बंधन घालून घेणे आवश्यक आहे. काही ठिकाणी स्वत: नागरिकही विशेष काळजी घेताना दिसून आले. सुरक्षारक्षक नसलेल्या काही उद्यानांमध्ये मात्र 'सोशल डिस्टन्सिंग'चे पालन होत नसल्याचे आढळून आले.
लॉकडाउनमुळे आमच्या गजानननगरातील उद्यान बंद राहिल्यामुळे माझ्यासारख्या अनेक ज्येष्ठ नागरिकांना तीन महिने खूप त्रास झाला. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ फिरण्याच्या सवयीला लगाम घालावा लागला. घरांमध्ये कोंडमारा होत होता. उशीरा का होईना प्रशासनाने उद्याने सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांना दिलासा मिळाला आहे. उद्यानांमधील मिळणारी शुद्ध व ताजी हवा आरोग्यासाठी पोषक असल्याने उद्यापासून नियमित "वॉकिंग'ला जाणार आहे. नागरिकांनी मास्क घालणे, सोशल डिस्टंसिंग मेंटेन करूनच उद्यानांमध्ये फिरण्याचा आनंद घ्यावा.
-हुकूमचंद मिश्रिकोटकर, ज्येष्ठ नागरिक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.